गेल्या शतकातील जगाचे तीन शिल्पकार - लेनिन, माओ-त्से-तुंग व महात्मा गांधी! त्यातील महात्माजी १९४८ साली आजच्याच दिवशी (३० जानेवारीला), कट्टर धर्मनिष्ठा व राष्ट्रवादाने भारावलेल्या नथुराम गोडसेच्या गोळीची शिकार झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच भारतीयांनी ‘राष्ट्रपिता’च गमावला. महात्माजींनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला; पण त्यांचीच अखेर हिंसेमुळे झाली, हा दैवदुर्विलास!
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हणून गौरवले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४४मध्ये त्यांचे वर्णन ‘राष्ट्रपिता’ अशा शब्दांत केले.
बापूजींचे कार्य, विचार व कारकीर्द याविषयी बरेच काही लिहिता-बोलता येईल. पाकिस्तानच्या निर्मितीला त्यांनी दिलेल्या संमतीबद्दल निर्माण झालेले वाद आजही तितक्याच चवीने चघळले जात आहेत.
या कोणत्याही वादाच्या जाळ्यात न अडकता आज इतकेच म्हणायचे आहे, की गेल्या शतकात एक खराखुरा ‘महात्मा’ आपल्यात वावरत होता. तो आपणच गमावला.
बापूजींच्या पवित्र स्मृतींस श्रद्धांजली!
- भारतकुमार राऊत